नवी दिल्ली – भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच अनिल चौधरी लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशातील डांगरोल या आपल्या गावीच अडकून पडले आहेत. त्यांचा उर्वरीत जगाशी संपर्क होत नसल्याने आणि मोबाइल नेटवर्कही मिळत नसल्याने ते चक्क एका झाडावर चढले. त्यांचे हे वृक्षारोहण सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी चौधरींची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही मालिका करोनाच्या धोक्यामुळे रद्द झाल्याने ते आपल्या गावी आले होते. 16 मार्चपासून ते इथे असून त्यांचे कुटुंब मात्र दिल्लीत आहे. लॉकडाऊनमुळे गावाबाहेरही जाता येत नाही आणि मोबाइलला नेटवर्कही नाही अशा दुहेरी संकटात ते सध्या सापडले आहेत.
अनेक प्रयत्न करुनही त्यांना नेटवर्क न मिळाल्याने अखेरचा प्रयत्न म्हणुन त्यांनी वृक्षारोहणही करुन पाहिले. अखेर कसेबसे नेटवर्क मिळाले व त्यांनी सोशल मीडियाद्वारे कुटुंब तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश मिळवले. त्यांना अडचणीचा सामना करावा लागला याबाबत अनेकांनी खेद व्यक्त करतानाच वृक्षारोहणाच्या या प्रसंगाबाबत चौधरींची चेष्टाही केली.