नवी दिल्ली – सीमेवरील सद्यस्थितीच्या संबंधात लष्कराकडून योग्य हाताळणी केली जात असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी काढले आहेत. त्यांनी पूर्व लडाख आणि चीन सीमेचा उल्लेख केला नाही पण त्यांना तोच उल्लेख अपेक्षित असावा आणि तेथील स्थिती भारतीय लष्कर अधिक चांगल्या पद्धतीने हाताळत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
लष्कराच्या कमांडर्सच्या परिषदेत बोलताना राजनाथसिंह यांनी हे प्रतिपादन केले. लष्करी कमांडर्सची ही चार दिवसांची परिषद जम्मू-काश्मीर आणि चीन सीमेवरील प्रत्यक्ष ताबारेषेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आली आहे.
यावेळी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, लष्कराच्या बळकटीकरणासाठी सरकार सर्व शक्य ती उपाययोजना करीत आहे. सद्यस्थितीत लष्कराने जो पुढाकार घेतला आहे त्याचा मला अत्यंत अभिमान आहे असे ते म्हणाले.
गेल्या पाच महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांनी आपापल्या बाजूने तेथे 50 हजार सैन्य आणून ठेवले आहे. कमांडर्सच्या परिषदेत याच स्थितीचा आढावा घेतला जात आहे. सोमवारपासून ही परिषद सुरू झाली आहे.