पुणे – हळदीच्या कार्यक्रमातील डीजेचा त्रास झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, त्याला लग्नघरातील व्यक्तींनी दोनदा जबर मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने ज्येष्ठाने बंडगार्डन नदी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या गुन्ह्यात भर लग्नमंडपातून पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना अटक केली.
ज्ञानेश्वर साळुंखे ( 70, रा. नवी खडकी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे ( 47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले ( 26), देवेश ऊर्फ नन्या पवार ( 18), यश मोहिते ( 19), शाहरुख खान ( 26), जय तानाजी भडकुंभे ( 22) यांना अटक केली आहे. ही घटना येरवडा येथील नवी खडकी भागात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तेथे डीजे लावल्यामुळे मोठा गोंधळ सुरू होता. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्यांचे वडील ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो, असे सांगितले.
यावरून आरोपींनी त्यांना अपमानित केले आणि हाकलून दिले. त्यानंतरही बराच वेळ गोंधळ सुरू होता. त्यामुळे साळुंखे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा, असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. नवरदेव चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. त्यानंतर फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडील ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली.
मारहाणीमुळे अपमान सहन न झाल्याने ज्ञानेश्वर यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी घरात लग्नकार्य असल्याने लगेचच आरोपींना अटक केली नाही. मात्र, लग्न लागताच नवरदेव पळून जाणार असल्याची खबर मिळाल्याने पोलीस लग्नाच्या ठिकाणी हजर राहिले. त्यांनी लग्न सोहळा झाल्यावर नवरदेवासह इतर आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दर्शना शेलार करत आहेत.