नवी दिल्ली – देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असताना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ देखावा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान रोजगार मेळ्याचे आयोजन करीत आहेत, असा दावा कॉंग्रेसने केला आहे. बेरोजगारीमुळे सरकारची प्रतिमा खालावली असून त्यामुळे केवळ देखाव्याच्या स्वरूपात असले कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
आज सकाळी एका रोजगार मेळाव्याला संबोधित करताना, मोदींनी 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. मोदींचा हा रोजगार मेळावा म्हणजे सर्वात मोठा जुमला असल्याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.
ते म्हणाले की मोदींनी दरवर्षीै दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्यात त्यांना साफ अपयश आले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ते हे कार्यक्रम करून लोकांची दिशाभुल करीत आहेत.
नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने आणलेली जीएसटी आणि अनियोजित लॉकडाऊनने एमएसएमई क्षेत्र उद्वस्त झाल्याने अनेकांचा रोजगार बुडला आहे. गेली नऊ वर्ष बेरोजगारांची फसवणूक सुरू आहे, आता निवडणुकांच्या काळात आपल्या सरकारला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागणार असल्याची जाणिव झाल्याने ते आता हा जुमला घेऊन आले आहेत असे रमेश यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
रमेश यांनी दावा केला की पंतप्रधानांनी ज्या लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत, ही आधीच मंजूर पदे आहेत जी काही प्रशासकीय किंवा आर्थिक कारणांमुळे भरली गेली नव्हती. मोठ्या संख्येने पदोन्नतीच्या बाबतीतही पंतप्रधानांकडून नियुक्ती पत्रे दिली जात आहेत, पदोन्नती म्हणजे नवी नोकरी नाही.
या सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या असताना जणूकाही आपणच या लोकांना नोकऱ्या दिल्या असे आता भासवले जात आहे. “पंतप्रधान रोजगार मेळा ही एक नौटंकी आहे आणि हा एक अवाढव्य अहंकार, प्रचंड व्यर्थता, अमर्याद आत्ममग्नता याचा आणखी एक पुरावा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.