पुणे – “खात्याचा कारभार हाती घेऊन नऊ महिने झाले, तरी आरोग्य खात्याचे अधिकारी माझे ऐकत नाहीत, मी सांगून थकलो आहे. योजनांची अंमलबजावणी करायला, कामे करायला प्रशासकीय अधिकारी जागचे हलायला तयार होत नाहीत, ते लालफितीच्या कारभारात अडकले आहेत.
एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार, सगळीकडे मीच जाणार का? एखाद्या प्रकल्पाला दिरंगाई झाली तर ठेकेदाराला वाढवून पैसे दिले जातात परंतु आशा वर्करला साधे हजार दोन हजार रुपये हे सरकार वाढवून देत नाहीत,’ असे म्हणत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रविवारी पुण्यात एका कार्यक्रमात सरकारला घरचा आहेर दिला.
एखादा शंभर कोटी रुपयांचा प्रकल्प, दिरंगाई झाल्यामुळे तो पाचशे कोटी रुपयांपर्यंत जातो आणि सरकार त्या ठेकेदाराला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे वाढवून देते. आणि दुसरीकडे मात्र ज्या “आशा वर्कर्स’ उन्हातान्हाची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुविधा पुरवणाऱ्या “आरोग्यदूत’ म्हणून काम करतात त्या सेविकांना हजार-दोन हजार मानधन वाढवून द्यायचे म्हटले, तरी सरकार मागेपुढे पाहते, हे खेदजनक आहे. असे स्वत:च्याच सरकारच्या कारभारावर टीका करणारे खळबळजनक भाष्य डॉ. सावंत यांनी केले.
याशिवाय या सेविकांना पैसे दिले तर सरकारच्या काय पोटात दुखते काय, हे बोलायला मी कोणालाही घाबरत नाही. मी खेडेगावातून आलेला माणूस आहे, जे वास्तव आहे ते मांडतो आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले. “माता सुरक्षित’, “जागरूक पालक-सुदृढ बालक’ किंवा नंदुरबार आदिवासी पट्ट्यातील कुपोषण कमी व्हावे म्हणून आखून दिलेला 44 कलमी कार्यक्रम, या सर्वच योजना आखून दिल्यानंतरही आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी त्या धोरणांची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करत नाहीत.
मी आखून दिलेल्या “स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’वर (एसओपी) अंमलबजावणी झाल्यास कुपोषणाचा मृत्यूदर शून्य टक्क्यावर येऊ शकेल. आरोग्य खाते हे सर्वात मोठे खाते असून अडचणीही तेवढ्याच आहेत. असेही खळबळजनक वक्तव्य डॉ. सावंत यांनी केले.