मुंबई – गुजरात मॉडेलबद्दल आता कोणीही बोलत नाही. गुजरातने देशाला खूप काही दिले आहे. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे पुत्र देखील दिले. देशाची एकता आणि अखंडता राखण्यात सरदार पटेल यांची सर्वात मोठी भूमिका होती. मात्र आता गुजरातने आणखी चार लोक दिली.
दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार. त्यावेळी झालेली सर्व बांधकामे आता विकली जात आहेत, अशा शब्दांत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला.
भूपेश बघेल हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आले की, 2024च्या निवडणुकीत छत्तीसगड मॉडेल भाजपच्या गुजरात मॉडेलला मागे टाकेल का? यावर ते म्हणाले की, गुजरात मॉडेल आहे तरी काय? पंतप्रधान मोदींना सत्तेत आठ वर्षे झाली, पण गुजरात मॉडेलचा देशाला काय फायदा झाला. आज भाजप गुजरात मॉडेलवर चर्चा करत नाही. छत्तीसगड मॉडेलची देशात नक्कीच चर्चा होत आहे.
सध्या देशात महागाई शिगेला पोहोचली असून देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमकडून सांभाळली जात नाही. हे सरकार सर्व काही विकत आहेत. एअर इंडियाला विकली, अनेक मोठ्या कंपन्यांना विकल्या. सर्व विमानतळ विकले जात आहेत. देशाची सर्व संपत्ती काही ठराविक लोकांच्या हातात जात आहे. तरीही देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही, ते म्हणाले.
तेल आणि गॅसच्या किमती कशा वाढत आहेत, ते तुम्ही पाहत आहात. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर डिझेल-पेट्रोलचे भाव कसे वाढत आहेत, हे सगळे पाहत आहेत, पण कोणी काही बोलत नाही. लोकांची फसवणूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.