नवी दिल्ली –दुश्मन के छक्के छुडा दे; हम इंडियावाले असे एक जोशपूर्ण गीत कुठल्याशा बॉलीवूडपटात आहे. तशाच जोशात सध्या इंडिया या देशव्यापी विरोधकांच्या आघाडीतील काही नेते आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. इंडियाची स्थापना झाल्यानंतर ती आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करेल, असा ठाम दावा ते सातत्याने करत आहेत.
पण, त्या आघाडीमधील काही घटक पक्ष अजूनही एकमेकांविरोधातच दंड थोपटत आहेत. तर, काही एकमेकांकडे संशयाच्या भिंगातून पाहत आहेत. भाजपविरोधात ताकदीने लढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेल्या इंडियावाल्यांचं ते वागणं बरं म्हणता येणार नाही. जनतेसमोर जाण्यासाठी त्यांच्यात मनोमिलन घडणे अगत्याचे आहे.
इंडियारूपी आघाडी अस्तित्वात आल्यानंतर विरोधकांचा उत्साह वाढल्याचे जाणवते. त्यातून नितीश, ममतांसारखे त्या आघाडीतील महत्वाचे नेते उत्साही प्रतिक्रिया देत आहेत. प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजपसमोर आता तगडे आव्हान उभे केल्याच्या आवेशात ते बोलत आहेत. पण, इंडियाचे सदस्य बनलेल्या काही पक्षांमध्ये अद्यापही पूर्ण मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. विशेषत: कॉंग्रेस आणि आप या पक्षांबाबत तसे म्हणता येईल.
कॉंग्रेस आणि आपमध्ये वारंवार शाब्दिक युद्धाला तोंड फुटत आहे. त्यातून त्यांच्यात तणाव निर्माण होत असल्याचे अन् विरोधक ऐक्यासाठी प्रतिकूल ठरणारे चित्र पुढे येत आहे. सर्वप्रथम दिल्ली सेवा अध्यादेशावरून आप आणि कॉंग्रेसमध्ये बिनसणार की काय असे वाटू लागले. त्या अध्यादेशाला कॉंग्रेसने तातडीने विरोध न दर्शवल्यास इंडियाच्या बैठकीत सहभागी न होण्याचा इशारा आपने याआधी दिला. कॉंग्रेसने विलंबाने का होईना पण आपला अपेक्षित भूमिका घेतल्यानंतर दोन्ही पक्षांमधील कटूता टळली. त्यानंतर दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा लढवण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात ठणाठणी झाली. त्या सर्व जागांवर पक्षसंघटन मजबूत करण्याची सूचना कॉंग्रेस श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना केली.
स्थानिक नेत्यांनी दिल्लीतील सर्व जागांवर पक्ष तयारी करणार असल्याचे म्हटले. त्यातून दिल्लीतील सगळ्या जागा लढवण्याचा कॉंग्रेसचा विचार असल्याचा चुकीचा संदेश दिला गेला. साहजिकच, आपमधून नाराजीचे तीव्र सूर उमटले. कॉंग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर इंडियात अर्थ काय राहिला, अशी प्रतिक्रिया आपने दिली. अर्थात, दिल्लीत लढण्यासंदर्भात मांडली गेलेली भूमिका वैयक्तिक असल्याचे म्हणत कॉंग्रेसने गैरसमज दूर केला. त्यानंतर कॉंग्रेसने स्पष्टीकरण दिल्याने तो विषय संपल्याचे आपने म्हटले. त्यामुळे ते पेल्यातील वादळ शमले.
पण, चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या छत्तिसगढवरून पुन्हा आप आणि कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. त्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. तसे असले तरी तेथील निवडणूक लढवण्यास आप सरसावला आहे. त्या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी छत्तिसगढचा दौरा केला. आपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी छत्तिसगढमधील सरकारी शाळांची स्थिती भयानक असल्याच्या आशयाचे भाष्य केले.
आपची सत्ता असणाऱ्या दिल्लीतील सरकारी शाळांच्या स्थितीचे गोडवेही त्यांनी गायले. साहजिकच, कॉंग्रेसला ती तुलना रूचली नाही. त्यातून कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी केजरीवाल यांच्यावर पलटवार केला. छत्तिसगढमधील आमच्या सरकारच्या कामगिरीची तुलना भाजपच्या मागील सरकारशी होईल. तुलना करायचीच असेल तर दिल्लीतील तुमचे सरकार आणि तेथील आमचे आधीचे सरकार यांच्यात करा. त्यासाठी क्षेत्र तुमच्या पसंतीचे निवडू. आहात का चर्चेसाठी तयार, अशी विचारणा करत खेरा यांनी आव्हान दिले. त्यातून दोन्ही पक्षांत पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात विरोधी बाकांवर असणारे महाविकास आघाडीचे घटक इंडियाचेही भाग आहेत. मात्र, त्यांच्यात एका भेटीने दाटलेले संशयाचे धुके अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यामधील ती भेट. शरद पवार यांनी घेतलेली ती भेट कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला खटकली आहे.
त्यातून महाविकास आघाडीत अस्वस्थतेचे वातावरण आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि त्या राज्यात विरोधी बाकांवर असणारे कॉंग्रेस, डावे पक्ष इंडियाचे सदस्य आहेत. त्या राज्यात त्यांच्यातील संबंध अद्यापही सुरळित नसल्याचे वारंवार चव्हाट्यावर येते. साहजिकच, मनापासून एकत्र येऊन जनतेसमोर एकोप्याने जाण्याची खबरदारी इंडियावाल्यांना घ्यावी लागेल, असे दिसते.