नवी दिल्ली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. देशामध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच वस्त्रोद्योग व्यवसायाला नवसंजीवनी देणारे नवीन धोरण जाहीर करणार असल्याचे माहिती पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांना दिली आहे.
वस्त्रोद्योग धोरण, सोयाबीन आयात-निर्यात धोरण तसेच साखरेचा बाजारभाव 38 रुपये स्थिर करण्याची मागणी शेट्टींनी गोयल यांच्याकडे केली. राजू शेट्टींनी दिल्लीतील कृषीभवनातील अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयात मंत्री गोयल यांची भेट घेतली. देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याने हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे.
वाढलेल्या महागाईमुळे, कच्चा मालातील चढ उतार, वीजेचे वाढलेले दर यामुळे व्यवसायात मंदीचे सावट निर्माण झालेले आहे. तसेच सुत दरातील दैनंदिन होणाऱ्या चढ उतारात सरकारने यार्न बॅंकेच्या संकल्पनेतून नियंत्रण करण्याची गरज असल्याची मागणी शेट्टींनी केली.
केंद्र सरकारने अदानी यांच्या कंपन्यांना पामतेल आयात करण्यास परवानगी दिल्याने देशातील सोयाबीनचे दर कोसळू लागले आहेत.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. याकरता केंद्र सरकारने पामतेल आयातीवर तातडीने आयात शुल्क वाढवण्याची मागणी शेट्टींनी केली आहे. तसेच खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कोलमडत असून खतांचे दर स्थिर राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी देखील शेट्टींनी गोयल यांच्याकडे केली.
30 टक्क्यांनी महागाई वाढली
केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योग जरी स्थिरावला असला तरी ऊस उत्पादनात 30 टक्क्यांनी महागाई वाढलेली आहे. मात्र केंद्र सरकारने एफआरपीमध्ये केवळ तीन टक्क्यांनी वाढ केल्याने देशभरातील शेतकऱ्यांना यंदा एफ.आर. पी पेक्षा जादा दर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बाजारातील साखरेचा दर किमान 38 रुपये स्थिर करण्याची मागणी केली.