बुऱ्हाणपूर – मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील माजी मंत्री आणि भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या अर्चना चिटणीस यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. बुऱ्हाणपूरचे सामाजिक कार्यकर्ते बालचंद शिंदे यांनी हे आरोप केले आहेत. अर्चना चिटणीस यांनी साखर कारखान्याच्या नावावर बुऱ्हाणपूरमधील शेतकऱ्यांचे सुमारे 2 कोटी रुपये आणि इतर मार्केट यार्डमधून 7.50 कोटी रुपयांचा गंडा घातला असून, त्यावर आता उच्च न्यायालयाने लोकायुक्त आणि मध्य प्रदेश सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत.
कॉंग्रेसनेही चिटणीस यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते बालचंद शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे, हे पत्र आता मध्य प्रदेश कॉंग्रेसने त्यांच्या एक्स अर्थात ट्विटर हॅंडलवर पोस्ट केले आहे.
नेपानगरच्या आमदार असताना 2003 मध्ये अर्चना चिटणीस यांनी स्वत: बुऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार आणि इतर मार्केट यार्डामधून साखर कारखान्याच्या नावावर सुमारे 7.50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते बालचंद शिंदे यांनी दाखल केली आहे.
आपल्या आमदारकीचा गैरवापर करुन चिटणीस यांनी बुऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर मंडईंमधून साखर कारखान्यासाठी सुमारे 7.5 कोटी रुपये काढले, पण साखर कारखाना सुरू झाला नाही. हे पैसे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे होते. या सर्वांनी अर्चना चिटणीस यांच्यावर अविश्वास दाखवत मंडईच्या खात्यातून पैसे काढण्यास आधीच आक्षेप घेतला होता. नंतर साखर कारखाना सुरू झाला नाही तेव्हा त्यांनी अर्चना चिटणीस यांना पैसे परत करण्यास सांगितले परंतु चिटणीस यांनी टाळाटाळ सुरू केली. कोट्यवधी रुपयांचा हिशेबही त्यांनी दिला नाही.
याप्रकरणी बुऱ्हाणपूरचे सामाजिक कार्यकर्ते बालचंद शिंदे यांनी लोकायुक्तात तक्रार दाखल केली होती, मात्र लोकायुक्तांनी हे प्रकरण फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी जबलपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. आता या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने लोकायुक्त आणि मध्य प्रदेश सरकारला सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र शिंदे यांनीही उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाला पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देऊन कारवाईची मागणी केली असून, मध्य प्रदेश कॉंग्रेसनेही त्यांच्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केली आहे.