आळंदी, तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे राहते घर असलेले ऐतिहासिक ठिकाण सिद्धबेट हे तपोवन या संस्थेस देऊ नये, अशी मागणी आळंदीतील मनसे, रिपब्लिक सेना, आळंदी जनहित फाउंडेशच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी किरण नरके, संदीप रंधवे, अर्जुन मेदनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये स्थान महात्म्य जोपासण्यास तसेच पावित्र्य राखण्यास सेवाभावी संस्थासह आळंदी नगरपरिषद यांनी कामकाज सुरू केले आहे. आळंदी हद्दीतील सिध्दबेट हे सिध्दबेट राहावे ते तपोवन या संस्थेस देण्यात येऊ नये, संबंधित प्रकल्प आणि जागा आळंदी नगरपरिषदकडे रहावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आळंदी नगरपरिषद, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता करण्याचे काम सिद्धबेटात सुरू आहे. यास अधिक गती देखील देण्यात आली आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी देखील सिद्धबेट एका संस्थेस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र त्यावेळीही आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून मोठे जनआंदोलन उभे करून सिद्धबेट इतर कोणत्याही संस्थेस देण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा अशीच काही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे निदर्शनास आल्याने सदर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आळंदी नगरपरिषदेस निवेदन देऊन विरोध दर्शविला आहे.