आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 11 जूनला माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीला येत असतात. त्या पार्श्वभूमीवर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वतयारी सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून आळंदी घाटा नजीकच्या जलपर्णी काढण्याच्या कामकाजाची आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संयुक्त पाहणी करून सदर काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.
आळंदी हद्दीतील इंद्रायणी पात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामास नगरपरिषदेच्या वतीने विनंती वरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत जलपर्णी काढण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. सदर कामाची प्रगती पाहून आवश्यक त्या सूचना देण्याकरिता अधिकाऱ्यांनी हा संयुक्त पाहणी दौरा केला.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आषाढी वारी पूर्व तयारी बैठक पार पडली. यावेळी डी. डी. भोसले यांनी इंद्रायणी पात्रातील जलपर्णी काढण्याच्या सुरू असलेल्या कामास आणखी गती देणेबाबत सूचना मांडली होती. या अनुषंगाने प्रशासनाने तत्काळ या प्रश्नाची दखल घेवून या संयुक्त पाहणीद्वारे आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना व यंत्रणांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाहणी वेळी आळंदी नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, बांधकाम अभियंता संजय गिरमे, मिथील पाटील, बोत्रे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते.