पाटणा – सध्या विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या न्यायाधिशांवरच आरोप करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे तो चिंताजनक आहे असे केंद्रीय विधी आणि न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. पाटणा हायकोर्टाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज त्यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आपल्या मनासारखा निकाल मिळाला नाही की कोर्टाच्या कामकाजावर आणि न्यायालयांवर सर्रास टीका होऊ लागली आहे.
सर्वच पातळ्यांवर काम करणाऱ्या न्यायाधिशांना निर्णय घेण्याची पुर्ण मोकळीक असली पाहिजे. त्यांच्यावर कोणत्याहीं प्रकारचा दबाव असता कामा नये असे मतही त्यांनी व्यक्त केले. जनहित याचिका दाखल करणाऱ्यांचे गट सोशल मिडीयावर कोर्टाच्या कामकाजाबाबत बदनामीकारक उल्लेख करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोशल मिडीयावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जे नवीन निर्बंध लागू केले जात आहेत त्या संबंधात बोलताना ते म्हणाले की आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनेच आहोत.
लोकांना मते व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे त्यांना सरकारवर टीकाही करण्याचा अधिकार असला पाहिजे असे आम्ही कायमच नमूद करीत आलो आहोत. पण सोशल मिडीयाचा गैरवापर जो सुरू आहे त्याला आळा घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठीच हे नवीन नियम लागू केले जात आहेत असे ते म्हणाले.