नवी दिल्ली -देशांत 24 तासांत 20 लाख 61 हजार चाचण्या घेण्याचा नवा विक्रम गुरुवारी नोंदवण्यात आला. तर देशातील संसर्ग दर 12.59 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
सलग आठव्या दिवशी करोना बाधितांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या गुरुवारी जास्त होती. तर गेल्या 24 तासांत तीन लाख 57 हजार 295 करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता दोन कोटी 27 लाख 12 हजार 735 वर पोहोचली आहे.
तर 20 मेपर्यंत एकूण 32 कोटी 44 लाख 17 हजार 870 जणांची चाचणी घेण्यात आली. गुरुवारी 20 लाख 61 हजार 683 जणांची चाचणी घेण्यात आली, अशी माहिती भारतीय वैद्यक परिषदेने दिली आहे.
याशिवाय भारतात सलग पाचव्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी बाधित नोंदवले गेले. दोन लाख 59 हजार 551 नव्या बाधितांमध्ये तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, प. बंगाल, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आसाम या दहा राज्यांत 76.66 टक्के इतके प्रमाण आहे.
तामिळनाडूत सर्वाधिक म्हणजे 35 हजार 579 बाधितांची संख्या नोंदवण्यात आली. त्या पाठोपाठ केरळात 30 हजार 491 बाधित नोंदवले. देशातील सक्रिय बाधितांची संख्या आता 30 लाख 27 हजार 925 वर पोहोचली आहे.
देशांत लसीकरण झालेल्यांच्या संख्येने 19 कोटींचा टप्पा ओलांडला. एकूण 10 कोटी 18 लाख 79 हजार 503 जणांचे लसीकरण झाले. त्यात 97 लाख 24 हजार 339 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. तर 66 लाख 80 हजार 968 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.
एक कोटी 47 लाख 91 हजार 600 आघाडीच्या करोना योध्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 82 लाख 85 हजार 253 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटातील 86 लाख चार हजार 498 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.