रांची: भाजपकडून झारखंडमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही नेते झारखंड विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. डाल्टनगंजमध्ये निवडणूक सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, नवीन बस, ट्रक, टँपोजमधून तर रोजगार मिळत आहे, आता लवकरच नवीन स्टील प्लांटही तयार होणार आहे. राज्यातील भाजपा सरकारने नवीन झारखंडसाठी सामाजिक न्यायाच्या पाच स्त्रोतांवर काम केले आहे.
पाच सूत्रांचा संदर्भ देताना मोदी म्हणाले की, पहिले सूत्र म्हणजे स्थिरता, दुसरे सूत्र – सुशासन, तिसरे सूत्र – समृध्दी, चौथे सूत्र – आदर आणि पाचवे सूत्र – सुरक्षा. झारखंडसाठी अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण देशाला आयुष्मान बनवण्याची ही ऐतिहासिक योजना येथूनच सुरू केली गेली. या योजनेचा अवलंब करून झारखंडने संपूर्ण देशाला दिशा दाखविली असल्याचे मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, येथून बाहेर पडणार्या बॉक्साइटचा मोठा भाग येथेच विकासासाठी खर्च करण्यात येईल. प्रथमच भाजप सरकारने यासाठी तरतूद केली आहे. आज झारखंडमधील प्रत्येक गावात रस्ते होत आहेत, वीज पोहोचत आहे, रोजगाराची नवीन साधने तयार केली जात आहेत.
विरोधी पक्षांवर हल्ला चढवत मोदी म्हणाले, या स्वार्थी लोकांना झारखंडची सेवा करण्याची भावना नाही. या स्वार्थी लोकांच्या युतीचा एकच अजेंडा आहे झारखंडच्या संसाधनांचा गैरवापर आणि या संदर्भात ते पुन्हा आपल्याला मत मागून गोंधळात टाकत आहेत.
झारखंडमधील नक्षलवादाच्या समस्ये संदर्भात बोलताना मोदी म्हणाले, येथे राजकीय अस्थिरता असल्याने ही समस्या नियंत्रणा बाहेर आहे. येथे सरकार स्थापन होते, पण ते पुन्हा उध्वस्त केल्या जाते. कारण मुळात काही लोक फक्त स्वार्थ आणि भ्रष्टाचार साधतात. भाजपाने झारखंडमधील प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि त्याच्या अभिमानास प्रोत्साहन दिले आहे. झारखंडला नक्षलवाद आणि गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी भाजपने भयमुक्त वातावरणासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच झारखंडला स्थिर सरकार दिले आहे. झारखंडमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केले, पारदर्शक व्यवस्था केली. झारखंडला लुटण्यापासून वाचवले, इथल्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा केल्याचे मोदी म्हणाले.