लुधियाना – नवे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. ते रद्दच केले पाहिजेत, असे पंजाब कृषी विद्यापीठातील संशोधक आणि केंद्र सरकारचा पुरस्कार नाकारणारे संशोधक डॉ. विरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
झाडांच्या संगोपनाबाबत सिंग यांनी केलेल्या संशोधनाबाबत फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सिंग यांना बुधवारी पुरस्कार देण्यात आला. व्यासपीठावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री सदानंद गौडांसमोर जात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.
त्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सिंग म्हणाले, शेतकरी योग्य आहेत आणि हे कायदे रद्द केलेच पाहिजेत हे सांगण्यासाठी मी हा पुरस्कार स्वीकारला नाही. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. केवळ पंजाबमधीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी निदर्शने करत आहेत. मात्र, त्यांचा आवाज कोणी ऐकूनच घेत नाही. दहशतवादी आले, असेही बोलले गेले. ते दहशतवादी नाहीत, ते शेतकरी आहेत, असे सिंग म्हणाले.
सर्व बुद्धिवादी पुरस्कार परत करत असताना मी हा पुरस्कार स्वीकारणे योग्य नाही, असे माझ्या आईने मला ठणकावले होते. हा पुरस्कार नाकारून मला केंद्रीय मंत्र्यांचा अपमान करायचा नव्हता. त्या कार्यक्रमानंतर मी मंत्र्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो होतो. त्यांची काही अडचण झाली असेल तर ते सांगतील, असे मला वाटले होते. पण ते काहीच बोलले नाहीत.