मुंबई -मागील काही दिवसांपासून सदावर्ते दाम्पत्य, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, राणा दाम्पत्य, हनुमान चालिसा आणि भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला यामुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी रविवारी ज्येष्ठ शिवसैनिक आजीची भेट घेतली. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर मग काय पाकिस्तानात जावून म्हणायची का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. राज्य सरकारने भोंग्यांबाबत बोलविलेल्या बैठकीला न जाता फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान मुख्यमंत्री कुठल्या तरी आजीच्या भेटीला जातात. ते अशा अविर्भात जातात जस काही युद्ध जिंकलं. एसटी संपातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली असती तर समजू शकलो असतो. असो पण आजीकडे गेल्यावर आजीने काय सुनावलं हे आपण सर्वांना पाहिलं, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण कऱण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा येणार होते. त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये ८० वर्षांच्या शिवसैनिक आजी देखील सामील झाल्या होत्या. ‘झुकेगा नही’ म्हणत या आजींनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. आजीचा पुढाकार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आजीच्या घरी भेट दिली होती.