मुंबई – उत्सर्जनाच्या नव्या मानदंडामुळे प्रवासी वाहनाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहनावरील जीएसटी कमी केला तर वाहन उत्पादक, वितरकाबरोबरच ग्राहकांनाही लाभ होईल, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले की, नव्या उत्सर्जनाच्या मानदंडामुळे या कंपन्यांना महागडे तंत्रज्ञान वापरावे लागत लागत आहे. त्यामुळे वाहनांचे दर वाढले आहेत.
ते म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानासाठी वाहन कंपन्यांनी 40 हजार कोटी रुपये तर वाहनांच्या सुट्या भागाच्या उत्पादकानी 30 हजार कोटी रुपये मोजले आहेत. दरम्यानच्या काळात लॉक डाऊनमुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही काळ जीएसटीमध्ये कपात केल्यास ग्राहकाना व उत्पादकांना लाभ होईल. भारतात वाहनावर तब्बल 28 टक्के जीएसटी आहे. त्याचबरोबर काही वाहनावर 1 टक्क्यापासून 22 टक्क्यापर्यंत अधिभार लागतो.
इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. वाहन निर्मात्या कंपन्यांनीही वाहने लोकप्रिय करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर भविष्यात या वाहनांचा प्रभाव वाढणार असल्यामुळे बऱ्याच वाहन कंपन्यांना या क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.