मुंबई – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपला जीव धोक्यात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुंबई पोलीसांवर तुरूंगात मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलीसांनी अर्णब गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. अर्णब यांनी अटकेवेळीही पोलीसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाणीमुळे त्यांच्या हातावर घाव झाला असून हाडाला देखील गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. त्यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे.
अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं आहे.
“अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्यांचा शारीरिक छळ राज्य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे.
गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.