मुंबई : अजित पवार तसंच राष्ट्रवादीवर नाराज होऊनच शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारल होतं. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, असा त्यांचा आरोप होता. आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातच आज अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवङणुकीविषयी महत्वपूर्ण विधान केलंं आहे. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत आणि अस्वस्थेत आणखी अजूनच भर पङणार आहे.
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे संपन्न झाले. बॅण्ड्रा येथे MET मध्ये अजित पवार गटाचा मेळावा पार पडला.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवङणुकीच्याविषयी भाष्य केलं.
अजित पवार म्हणाले की, 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार आहे.“आमच्या अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पहिल्या रांगेतील अनेक आमदार नेते उपस्थित असायचे. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की, 2024 सालातही नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार. मी खोटं नाही बोलणार. मला खोटं बोलून काहीही मिळवायचं नाही.” असं अजित पवार यांनी सभेत सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, ताकदीने विधानसभा लढवायची आहे. आपले 54 आमदार आहेत, तेवढ्या जागा तर आपल्याला मिळणारच आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या जागा आपल्याला मिळतील. जवळपास 90 जागा आपल्याला लढवायच्या असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
अजित पवार यांच्या या विधानामुळे आता शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत अजूनच भर पङणार आहे. कारण काही महिन्यापूर्वींच आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याने बावनकुळे यांनी आपल्या विधानावरुन पलटी मारली होती आणि शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, असे स्पष्टीकरणच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.