औरंगाबाद – चंद्रकांत पाटील हे एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. ते जे, आरोप करतायत त्याचे पुरावे द्यावे. बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. हेलिकॉप्टरमधून मी जमीनी बघत असतो, असे ते म्हणतात. पण हेलिकॉप्टरने फिरायला परवानगी घ्यावी लागते, किती प्रवासी असतात त्यांची माहिती द्यावी लागते. त्यांनी सांगावं मी कधी असं खास हेलिकॉप्टर घेऊन गेलो. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असं त्यांनी करू नये, अशा खास शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
औरंगाबादमध्ये गुरुवारी झालेल्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप, किरिट सोमय्या यांच्यावरील हल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात करोना काळात झालेले काम सर्वांनीच पाहिले आहे. राज्याच्या कामाचे न्यायव्यवस्थेसह जगभरात कौतुक करण्यात आले. दाटवस्ती असलेल्या धारावीत करोनाचे संकट आटोक्यात आणणे आव्हानात्मक काम होते. तरीही विविध मार्गाने आम्ही करानाचे सावट आटोक्यात आणले. पण काही जण राजकीय भूमिकेतून बोलतात.
शरद पवार साहेब अशी संकटे येतात, तेव्हा राजकीय भूमिका बाजूला ठेवून मदतीला धावतात. रेल्वे ज्या सुटल्या त्या गुजरातमधून किती सुटल्या, दुसऱ्या राज्यातून किती सुटल्या ते बघावे. मजुरांची आपण व्यवस्था केली होती, पण त्यांना त्यांच्या गावी जायचे होते. त्यामुळे त्यांची व्यवस्था करावी लागली, असेही ते म्हणाले. तसेच किरिट सोमय्याच्या पुणे दौऱ्याबाबत दिल्लीची टीम पुण्यात येऊन त्यांनी पुणे पोलीसांबरोबर चर्चा केली. काय घडले, कसं घडले याची माहिती घेतली आहे. राज्यातील पोलीसांची जबाबदारी आहे, कुणाला काही त्रास होणार नाही. तसेच राज्यात काही झाल्यास केंद्रीय गृहविभाग माहिती घेत असतो, असेही त्यांनी सांगितले.