संतोष पवार
सातारा – जिल्ह्यातील 319 पैकी 138 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप व शिंदे गटाने 142 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाच ग्रामपंचायती मिळाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेसची वाताहत झाली असून अवघ्या 13 जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. राज्यातील सत्तांतराचा जिल्हास्तर, तालुकास्तर व गावस्तरावरही परिणाम झाल्याने सर्वाधिक ग्रामपंचायती कोण मिळवणार याची उत्सुकता होती. जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी दोन महिन्यांपासून वातावरण तापले होते. अनेक ठिकाणी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
फलटण विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा- जावळी मतदारसंघात खा. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगाव- खटाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदेविरोधात आ. महेश शिंदे, माण मतदारसंघात आ. जयकुमार गोरेविरोधात शेखर गोरे, प्रभाकर देशमुख, कराड उत्तरमध्ये आ. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात डॉ. अतुल भोसले, पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटांमध्ये या निवडणुकीत संघर्ष झाला. आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण गाजले होते.
जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीपैकी 317 ठिकाणी निवडणूक झाली. त्यापैकी 58 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 259 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक व भोंदवडे या गावातील एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने निवडणूक झाली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सातारा तालुका 12, जावळी तालुका 4, कोरेगाव तालुका 31, वाई तालुका 6, खंडाळा तालुका 2, महाबळेश्वर तालुका 2, कराड तालुका 17, पाटण तालुका 21, माण तालुका 14, खटाव तालुका 9, फलटण तालुका 20 अशा 138 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्या.
भाजपने सातारा 17, जावळी 9, कोरेगाव 3, वाई 1, कराड 10, माण 13, खटाव 1, फलटण 2 अशा 55 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. बाळासाहेबांची शिवसेनेने सातारा 8, कोरेगाव 11, महाबळेश्वर 3, पाटण 64, खटाव 1 अशा 87 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कोरेगाव 1, पाटण 1, माण तालुक्यात 3 अशा पाच ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. कॉंग्रेसने कराड 12, खटाव 1 अशा 13 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. रासप 1, मनसे 1, तटस्थ 1, प्रभाकर घार्गे गट 1, सह्याद्री कदम 1, प्रल्हाद पाटील 1 असे पक्षीय बलाबल या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तासंघर्ष
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान पाटणमध्ये जोरदार सत्तासंघर्ष दिसून आला. 86 पैकी 64 ग्रामपंचायती मिळवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली ताकद दाखवून दिली. कोरेगाव मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 31 ग्रामपंचायती ठेवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेला 14 ग्रामपंचायतींवर यश मिळाले. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात आ. मकरंद पाटील यांचा वरचष्मा आहे. वाई तालुक्यातील एक ग्रामपंचायत भाजपला मिळवण्यात यश आले. सातारा, जावळी तालुक्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. कराड तालुक्यात आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. माण तालुक्यात आ. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार संघर्ष दिसून आला. फलटण तालुक्यात 24 पैकी 20 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना धोबीपछाड दिले आहे.