सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही आमदार येत्या आठवडाभराच्या कालावधीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
तत्पूर्वी काल चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसमधील नवनिर्वाचित कार्याध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नको असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, त्यांना विरोधी पक्षांमध्ये गोंधळ निर्माण करायचा आहे, त्यांच्या दाव्यांवरून असे दिसून येते की त्यांच्याकडे उमेदवार नाहीत आणि म्हणूनच इतर पक्षांकडून उमेदवार आयात करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कोणीही भाजपाकडे वळणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.