गडचिरोली – शनिवारी झालेली चकमक तब्बल 10 तास चालली. गडचिरोलीच्या इतिहासातील ही सर्वात दीर्घकाळ चाललेली चकमक होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 कमांडोजची 16 पथके या कारवाईत सहभागी झाली होती. त्यांची संख्या सुमारे 500 होती. माओवादी जंगलात लपल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. गडचिरोलीत किमान 100 नक्षलवाद्यांशी आमची चकमक उडाली होती. त्यात छत्तीसगडचेही काही नक्षलवादी होते. आम्ही जोरदार हल्ला केल्याने 26 नक्षलवादी मारले गेले. तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले असं गडचिरोलीच्या पोलिसांनी सांगितलं.
डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं. अॅडिशनल एसपी समीर, अॅडिशनल एसपी अनूज तारी यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच सोमय मुंडे हे ग्राऊंडवर लीड करत होते. प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी सांगितलं. सकाळी 6 वाजता ही चकमक सुरू झाली. तब्बल 10 तास ही चकमक सुरू होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मेळाव्यासाठी सुमारे 100हून अधिक माओवादी जमले होते. त्यात दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य प्रभाकरचा समावेश होता. त्याचा शरीररक्षक या चकमकीत मारला गेला मात्र, प्रभाकर 75 साथीदारांसह पळून गेला. शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी तेलतुंबडेचा मृतदेह ओळखला आहे. तेलतुंबडे याचा मृतांत समाव्रेश असल्याची अटकळ शनिवारी बांधण्यात येत होती. मात्र, पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळत नव्हता. तेलतुंबडे (वय 58) हा गडचिरोलीत चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या नेत्यांमध्ये सर्वात मोठा होता. सर्व नक्षलवादी हे वर्दीवर होते.
पोलिसांनी जारी केलेल्या यादीनुसार मृतांची नावे (इनामाची रक्कम)
बंडू उर्फ दसलू गोटा(चार लाख), प्रमोद उर्फ दलपत कचलमी (चार लाख), कोसा उर्फ मुसाखी रा. बिसतर (चार लाख), निरो रा. दक्षिण माड, छत्तिसगढ, विमला उर्फ इमला उर्फ कमला उर्फ मानसी बोगा (इनाम चार लाख), चेतन पाडा रा. द. बस्तर (दोन लाख), किशन उर्फ जैमन रा. दर्भा, छत्तीसगढ (आठ लाख), भगतसिंग उर्फ प्रदीप उर्फ तिलक जादे (सहा लाख) सन्नू ऊर्फ कोवची, रा. बस्तर (आठ लाख), प्रकाश उर्फ साधू बोगा (चार लाख) मालचू रा. बस्तर (चार लाख), नवलू राम उर्फ दीपक तुलवी (चार लाख) भगगसिंग जादे आणि विमला बोगा हे मिलिंद तेलतुंबडेचे शरीररक्षक होते. तर लच्छू हा प्रभाकरचा शरीररक्षक होता. ज्या नक्षलवाद्यांची ओळख पटली नाही ते छत्तिसगढ आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील असावेत. त्यामुळे स्थानिक शरणार्थी नक्षलवाद्यांना त्यांची ओळख लागू शकली नाही. या चकमकीत जखमी झालेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्या जीविताचा धोका टळला आहे, असे अतिरिकत पोलीस आयुक्त समरि शेख यांनी सांगितले.