पुणे – नवरात्रोत्सवात 9 दिवस उपवास केले जातात. या पार्श्वभूमीवर उपवासासाठी लागणाऱ्या भाज्यांची विशेषत: भेंडी, बटाटा, राजगिराच्या मागणीत वाढ झाली आहे. राजगिराची गड्डी स्वस्त असली तरी भेंडी आणि बटाट्याच्या भावात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात एक किलो भेंडीची 120 ते 140 रुपये किलो या भावाने विक्री होत आहे. गेल्या महिनाभरापासून बटाट्याचे भाव तेजीत असून 50 ते 60 रुपये किलो या भावाने विक्री होत आहे.
नवरात्रोत्सवात रताळ्यांची मुबलक आवक होत आहे. किरकोळ बाजारात एक किलो रताळ्यांची प्रतवारीनुसार 60 ते 80 रुपये भावाने विक्री होत आहे. राजगिराच्या एका गड्डीची विक्री 12 ते 15 रुपये भावाने होत आहे. पावसामुळे बहुतांश फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात बटाट्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे भावात तेजी आहे, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.