पुणे – पुरंदर तालुक्यातून सिताफळाचे मोठे उत्पादन होते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि धुक्याचा परिणाम तेथील पिकावर झाला आहे. उत्पादनापैकी निम्म्या मालावर काळे डाग आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सिताफळाची लागवड कोरडवाहू जमिनीत होते. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील वाघापूर, गुऱ्होळी, नायगाव, पिसर्वे, काळेवाडी, सोनोरी, पिंपळे या भागांत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, बाजारात दररोज सुमारे 10 ते 15 टन सिताफळाची आवक होते. त्यामध्ये खराब मालाचे प्रमाण अधिक आहे. एका किलोला घाऊक बाजारात 5 ते 70 रुपये असा भाव मिळत आहे.
फळ खाण्यामुळे सर्दी खोकला होतो. त्यामुळे करोनाच्या साथीच्या काळात त्याची फारशी विक्री झाली नसल्याने भाव मिळाले नाहीत. आता काळे डाग असल्याने विक्री होत नाही. गेल्या वर्षींच्या तुलनेत केवळ 20 ते 25 टक्केच भाव मिळत आहे. 75 टक्के शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. करोनामुळे प्रक्रिया उद्योग बंद असल्याचाही फटका भावाला बसत आहे.