शर्मिला जगताप
शुभांगी एका घरातील सून असते. लहानपणी मनावर झालेल्या विलक्षण परिणामाची परिणती म्हणून ती सतत स्वतःला हरवून बसत असते. नवऱ्याचा स्पर्शसुद्धा टाळणारी शुभांगी एखादे वेळेस पेटून चिडून उठत असते, ती बावरते, आसूड घेऊनही उठते. अशा या शुभांगीला निर्मल स्वरूप ताळ्यावर आणतो. तिची मनोरुग्णावस्था तो नेमकी ओळखतो. तिला बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो आणि अखेरीस शुभांगी सदाची पत्नी म्हणून आपले आयुष्य सुरू करते.
वरवर भुताटकीचे वाटणारे हे नाटक. शुभांगीच्या झपाटलेपणामागे कारणपरंपरा आहे. केवळ भुताखेताने ती असे वागत नाही तर ती तिची दुर्बल मनोवृत्ती तिला असे वागायला भाग पाडते. तिला घरातून बाहेर जाण्याचा नेमका रस्ता सापडत नाही. तिच्या मनोरुग्णावस्थेला वाट सापडत नाही. ती नीट सांगू शकत नाही इतकेच नव्हे तर बोलूही शकत नाही.
निर्मल स्वरूप तिने काढलेल्या चित्रातून तिची मनोवस्था जाणतात. तिच्या मनातील आघाताची त्यावरून त्यांना कल्पना येते. तिचा कोंडमारा परिस्थितीजन्य आहे हे त्यांना जेव्हा कळून चुकते तेव्हा ते त्यावर इलाज शोधू लागतात. शुभांगीच्या मनावर जो परिणाम बालमनात झाला, तिच्या मनात जो भयगंड उत्पन्न झाला आहे त्या भयगंडाचे विश्लेषण हे नाटक करते. एका अर्थी हे मनोविश्लेषणात्मक असे नाटक आहे.
भूतखेत-अंगारे धुपारे या गोष्टी आजही अनेकांच्या डोक्यातून जात नाहीत. आजही “झपाटलेल्या’ तरुण मुलींच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी त्यांना साधुबुवा, मांत्रिकांच्या हाती दिले जाते. हे भोंदूबाबा त्या मनोरुग्ण तरुणींचा फायदा उचलतात, ही बाब या नाटकाच्या पार्श्वभूमीवर तरुणींनी, पालकांनी आणि समाजाने लक्षात घ्यावी. अशा तरुणींना योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे.