मुंबई – राज्यात येत्या 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान “कौमी एकता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
या सप्ताहांतर्गत गुरूवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल. यामध्ये धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे आयोजन करण्यात येईल.
शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, तसेच कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.