काश्मीर विषयक निर्णयावर राहुल गांधी यांनी दिला इशारा
नवी दिल्ली – अधिकाराचा आणि सत्तेचा दुरपयोग करून घेण्यात आलेल्या निर्णयाचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. काश्मीर बाबत केंद्र सरकारने काल घेतलेल्या निर्णयावर आज आपल्या ट्विटर अकौंटवर प्रथमच जी प्रतिक्रीया दिली आहे त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे.
राहुल गांधी यांनी या संदेशात म्हटले आहे की जम्मू काश्मीरची एकतर्फी विभागणी करून आणि तेथील लोकप्रतिनिधींना तुरूंगात टाकून राष्ट्रीय एकात्मता साधता येत नाही. देश लोकांमुळे बनतो, कोणत्याही भूखंडाने किंवा केवळ कोणत्याही भुप्रदेशामुळे कोणताही देश बनत नाही. सत्तेचा आणि अधिकाराचा दुरूपयोग करून जे निर्णय घेतले जातात त्याचे देशाच्या सुरक्षेवर विपरित परिणाम होत असतात असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
काश्मीर विषयी निर्णय घेण्याच्या आधीच काश्मीरातील नेत्यांना आणि तेथील लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली आहे त्यावरही त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, राजकीय नेत्यांना करण्यात आलेली अटक घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी आहे. हा मुर्खपणाचा निर्णय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींनाच अटक झाली असेल तर त्यामुळे जी पोकळी तेथे निर्माण झाली आहे ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होऊ शकतो म्हणून हा निर्णय मुर्खपणाचा ठरू शकतो असे राहुूल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या राजकीय नेत्यांची त्वरीत सुटका करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.