डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतण्याची प्रतिक्रीया
कोलकाता – काश्मीर मध्ये जे कलम 370 कलम लागू होते त्यामुळे एकूणच सलोखा धोक्यात आला होता त्यामुळे हे कलम रद्द करणे गरजेचेच होते अशी प्रतिक्रीया भारतीय जनसंघाचे दिवंगत संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचे पुतणे चितत्तोष मुखर्जी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की या कलमाच्या विरोधात आमच्या काकांनी मोठा लढा दिलाआणि त्यासाठीच त्यांनी प्राणार्पण केले आहे. हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता असेही त्यांनी म्हटले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला या विषयी प्रतिक्रीया देताना 90 वर्षीय चित्ततोष यांनी म्हटले आहे की कलम 370 मुळेच काश्मीरात दहशतवाद निर्माण झाला होता. त्यातूनच जम्मू काश्मीरात विघटनवादी कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा काही घटना विरोधी किंवा बेकायदेशीर मानता येणार नाही. चित्ततोष मुखर्जी हे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधिश आहेत.
ते म्हणाले की कलम 370 ची घटनेतील तरतूद तात्पुरत्या स्वरूपाची होती. त्यामुळे ती रद्द करण्याने घटनेची कोठेही पायमल्ली होत नाही. एकवेळी ही तरतूद रद्द करण्याने पंडित नेहरूंनी काश्मीरी नेत्यांना जी काही आश्वासने दिली होती त्याचा काही प्रमाणात भंग होत असेल पण घटनेची त्यातून कोणतीही पायमल्ली होत नाही. आता परिस्थिती बदलली आहे. ही बदलती परिस्थीती लक्षात घेऊन भारतीय कायदे त्या राज्यालाही लागू केले पाहिजेत. भाजपने या स्थितीची जबाबदारी घेऊन हा निर्णय घेतला आहे. तो त्यांचा निर्णय आहे तो या क्षणी घेणे योग्य होते की अयोग्य हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे असे ते म्हणाले.
अत्यंत विपरीत स्थितीत जम्मू काश्मीर हे भारताशी जोडले गेले त्यामुळे घटनेत कलम 370 चा समावेश करण्यात आला होता. पंडित नेहरूंच्या सरकारने हा निर्णय घेतल्यामुळेच शामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.