गुवाहाटी – कॉंग्रेसने लोकसभेतील विरोधी पक्षाचा दर्जा गमावला. सध्या त्या सभागृहात असणाऱ्या जागाही कॉंग्रेसला पुढील निवडणुकीत राखता येणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 300 हून अधिक संख्याबळाच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा ते पद भुषवतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी केला.
आसामच्या दौऱ्यावेळी शहा यांची गुवाहाटीत सभा झाली. त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकून तो पक्ष राजकारण करत आहे. त्यासाठी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे असे कारण पुढे केले जात आहे.
कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांतील उदाहरणे देता येतील. नव्या विधानसभा इमारतींची पायाभरणी राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी, राहुल गांधी या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते झाली. कॉंग्रेस मोदींना संसदेत बोलू देत नाही. जनतेने मोदींना बोलण्यासाठी कौल दिला आहे. पंतप्रधानांचा अनादर म्हणजे जनादेशाचा अवमान करण्यासारखे आहे, असे शहा म्हणाले.