मुंबई ( Narayan Rane on Uddhav Thackeray ) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला होता. यावरुन आता भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूपी सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वीच रद्द केले असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याचेही ते म्हणाले. आता उद्धव ठाकरेंनी घरात गप्प बसावे असा सल्ला राणे यांनी दिला.अडीच वर्ष राज्यावर जे संकट होते ते संकट दूर करून गणरायाचे आगमन झाले आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई मनपावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबई महानगरपालिका अनेक वर्षे त्यांच्या हातात आहे. मात्र, त्यांच्याकडून मुंबईचे भले होणार नाही. मुंबईला अगदी बकाल करून ठेवले आहे. टक्केवारीने मुंबईचे नुकसान केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबई मनपात सत्ता परिवर्तन होईल.
आम्ही मुंबई मनपावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू असा दावा त्यांनी केला. तसेच राणे यांनी उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांना शेलक्या भाषेत लक्ष्य केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने आदित्य राज्यात टीवटीव करत फिरत असल्याची टीका त्यांनी त्यांचे नाव न घेता केली.