– संजय गिधाड यांची पालकमंत्री विखे यांच्यावर टीका
कोपरगाव – गणेशच्या निकालाने विखे पुरते कामाला लागले असून, विवेक कोल्हे यांचा धसका त्यांनी घेतला आहे. साखर वाटप, देवदर्शन, अरेरावीवरून भाऊ- दादा सुरू झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच कोपरगाव येथे दौरा करून कोल्हे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी सोयरे आणि विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. कोल्हेंबाबत नाव न घेता पातळी सोडून विखेंनी गाळ काढण्याची भाषा केली. आमदार काळे यांची गॅरंटी मी घेतो, आगामी काळात त्यांच्या पाठीशी असल्याचे भाष्य केले. यावर राहता मतदारसंघात मात्र उलट प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी विखेंनी बाहेर जाऊन गॅरंटी घेणे सोडावे, आधी स्वतःची गॅरंटी आगामी राजकीय वाटचालीत राहिली नाही, याचा विचार करावा, असा टोला संजय गिधाड यांनी लगावला.
नेहमीच जिरवाजिरवीचे राजकारण करण्यात रस असणारे कुटील राजकारणी म्हणून विखेंची ओळख आहे. ज्याच्यासोबत ते असतात त्याच्या बाबतीत घात होतो. दमबाजी, दडपशाही या विरोधात राहाता तालुक्यातील जनतेने श्री गणेश कारखान्यात आगामी विधानसभेची चुणूक दाखवली आहे .आपलेच जहाज जनता पलटी करणार आहे, याची भीती कदाचित विखेंना अस्वस्थ करत असल्याने त्यांचा तोल जात आहे.
५० वर्षे सत्ता भोगून कधी राहाता तालुक्यातील युवक यांना दिसला नाही. आता कोल्हे यांनी एमआयडीसी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश आले तर आपल्याला श्रेय मिळणार नाही, या भीतीने घाईघाईत विखेंनी एमआयडीसी आणि रोजगार विषयात उडी घेतली. राहाता तालुक्यात आजवर अनेकांची वाताहत करणारे मोठ्या मनाने रोजगार आणतील, यावर कुणाचा विश्वास बसत नाही.
त्यामुळे अपरिहार्यता म्हणून विवेक कोल्हे या युवकावर जनमानसात निर्माण झालेल्या विश्वासाने विखेंना हे सर्व करणे भाग पडले, अशी जोरदार चर्चा राहाता मतदारसंघासह जिल्ह्यात सुरू झाली आहे. येत्या काळातही विखेंनी बाहेर जाऊन काड्या करने यात वेळ घालवणे आणि मतदारसंघ आपली मालकी आहे, मतदार आपल्या दावणीला आहेत, असा समज करून गृहीत धरू नये, असा सल्ला दिला.