सोनई – शनिशिंगणापूर ते संभाजीनगर-अहमदनगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याला प्रशासनाची साडेसाती लागलेली आहे की काय? असा प्रश्न शनिभक्तांना पडला आहे. याबाबत नेवासा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. पंकज जाधव यांनी याबाबत लवकरच एक जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय देवस्थानला जोडणाऱ्या संबंधित रस्त्याबाबत संबंधित विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. राहुरी-शिंगणापूर ते महामार्गापर्यंत जरी केंद्रीय तीर्थक्षेत्र विकास निधीतून रस्त्याचे काम सुरू असले, तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शनिशिंगणापूर ते संभाजीनगर हायवेपर्यंत रस्त्याचे काम अगदी शंभर टक्के अपूर्णावस्थेत असून, न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. असे असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे भाविकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. भाविकांना रस्त्यांचा अंदाज नसल्याने वाहनांचे नुकसान होते. जीवित हानी होते याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांना जाग कधी येणार?
उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का या गोष्टीकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता यामुळे या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
साहेब, नेमके कोणत्या साइटवर जातात?
रस्तादुरुस्तीची मागणी सातत्याने केली असता त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी कोणीही उचलत नाही, कधीतरी उचलला तर साहेब साइटवर गेले आहेत, असे उत्तर दिले जाते. रस्त्याची दयनीय अवस्था पाहता साहेब नेमके कोणत्या साइटवर जातात, असा प्रश्न निर्माण होत आहे. शनिशिंगणापूरला राज्य व राज्याबाहेरून भाविक येत असतात. तरीसुद्धा अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्त करणे शक्य होत नाही का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.