कर्जत – निंबोडी (ता. कर्जत) येथे शेळी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले. खंडू गरड (वय : 50) व भरत बर्डे (वय :35), अशी या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. बापू गणपत गरड यांच्या फिर्यादीवरुन कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी, कर्जत तालुक्यातील निंबोडीमधील बापू गरड यांना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शेळीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी चोरटे शेळ्या चोरून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी चोरटे साधारण 100 मीटर अंतरावर होते. तिघेजण शेळी पळवून नेत असल्याने लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जमा झालेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला. त्यामुळे शेळी जागेवरच सोडून ते दुचाकीवरुन पळून जाऊ लागले.
त्यात मागे बसलेल्या एका चोरट्यास ग्रामस्थांनी पकडले. सहा ग्रामस्थांनी त्याच्यावर झडप घातली होती. त्यामुळे अन्य दोघे चोरटे पसार झाले. मात्र, काही वेळातच पकडलेल्या साथीदाराला सोडविण्यासाठी ते पुन्हा आले अन् त्यांनी फायर आर्मने शेतकर्यांच्या दिशेने थेट अंगावरच दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा साथीदार सोडून दिला. मात्र, या गोळीबारात जे शेतकरी जखमी झालेले. त्यांना तत्काळ कर्जत येथे व नंतर नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली.
श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे करीत आहेत. गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या घटनेच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.