‘ड्रॉप’चा ‘फंडा पुन्हा चर्चेत, गुन्हेगारांच्या नाड्या कायमच्या आवळण्याची गरज
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – गुन्हेगारांनी ‘ड्रॉप’चा ‘फंडा’ गेल्या दहा वर्षांत जवळपास ‘ड्रॉप’च केला होता. मात्र, तो फंडा आता पुन्हा ‘अडॉप्ट’ केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असून श्रीगोंद्यात महिनाभरात तब्बल चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा आहे.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली शहरी अथवा परप्रांतीय मंडळींना गावाकडे बोलावून त्यांना लुटण्याचे ‘ड्रॉप’ श्रीगोंद्यात अनेकदा घडले. त्यांच्या तक्रारी कधी पोलिसांच्या दप्तरी नोंदविल्या गेल्या, तर कधी पोलीस ठाण्या’बाहेर’च चर्चा होऊन ती प्रकरणे दडपली गेली. गेल्या दहा वर्षांत मात्र ‘ड्रॉप’चे प्रकार जवळपास पूर्णतः थांबले होते. मात्र, गेल्या आठवड्यात न्यायाधीशांचे सहकार्य मिळवून देण्याच्या नावाखाली परप्रांतीय मंडळींना सव्वापाच लाखांना लुटल्याची घटना चिखली येथे घडल्यानंतर हे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यानुसार गेल्या महिनाभरात तालुक्यात तब्बल एक नव्हे चार ‘ड्रॉप’ झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या भावाला लवकर सोडविण्यासाठी न्यायाधीशांचा लघुलेखक व लिपिकाला पैसे देण्याच्या नावाखाली दिल्ली येथील दोघांना आणायला लावलेली ५ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम व एक भ्रमणध्वनी जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना तालुक्यातील चिखली शिवारात बुधवारी (दि.६) घडली. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच चिखली शिवारात रविवारी (दि.१०) पुन्हा एक ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा समोर येत आहे. हा ड्रॉप स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाखाली झाल्याची चर्चा असून त्यातील रक्कम अथवा आरोपींबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
साधारणपणे महिन्याभरापूर्वी मध्यप्रदेशच्या एका पाणीपुरी विक्रेत्याला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली तालुक्यात बोलावून त्याला पाच लाखांना लुटल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर साधारणतः दीड महिन्यांपूर्वी देखील एक ड्रॉप झाल्याच्या चर्चा झडत असून तो स्वस्तात सोन्याच्या नावाखाली झाला की अन्य कोणत्या याबाबत माहिती समजू शकली नाही.
दरम्यान, महिनाभरात तालुक्यात चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा रंगली असली तरी पोलीस ठाण्यात मात्र अद्यापपर्यंत एकच तक्रार दाखल झाली आहे. इतर तीन ‘ड्रॉप’बाबत पोलीस अधिक माहिती मिळवित असल्याचे समजते. तालुक्यातील वाढलेले ड्रॉपचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी ‘अलर्ट’ होऊन या प्रकारांना आळा घालतानाच संबंधित गुन्हेगारांना कायमची अद्दल घडविण्याची गरज आहे.