साहित्य संमेलनात आ. जगताप यांची प्रकट मुलाखत रंगली
नगर – ऐतिहासिक अहमदनगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असून या शहराने दोनदा महापौर आणि दोनदा आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे शहर विकासाचा अनुशेष काही प्रमाणात भरून निघत असल्याचे शब्दगंध संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत स्पष्ट केले.
15 व्या शब्दगंध साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष आ. जगताप यांची पत्रकार मुरलीधर कराळे, बंडू पवार, उद्धव काळापहाड, लेखक संजय कळमकर व जयंत येलुलकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे हे यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, की पंधरा वर्षानंतर शहराच्या आसपास उपनगरे वेगाने वाढत आहेत. नागापूर, बोल्हेगाव उपनगरात 60 ते 70 हजार तपोवन रोडला 25 हजार, तर पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, कल्याण रोड, बुरुडगाव रोड, केडगाव,
अरणगाव रोड भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या भागातील सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. तर बुरुडगाव रोड, अरणगाव रोड, केडगाव रोड असा त्रिकोण एकमेकांना जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सावेडी रस्त्यावर सामाजिक न्यायभवना समोर मोठे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. कचराकुंडी मुक्त शहर अशी आपल्या शहराची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नजर बदला, नगर बदलेल असे ते म्हणाले.
आपल्या निरोगी शरीराचे रहस्य काय ? या डॉ. संजय कळमकर यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सकारात्मक विचार हे आपल्या निरोगी आणि सुदृढ शरीर आणि मनाचे रहस्य आहे. आपल्या मातोश्रीकडे पाहिले की मला सकारात्मक ऊर्जा मिळते. राजकारण आणि समाजकारणाचा वसा मला वडिलांकडून मिळाला. सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. जनतेशी माझे भावनिक नाते निर्माण असून ते जपण्याचा प्रयत्न करतो.