जयंत कुलकर्णी
नगर – यंदा मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने जमिनीत ओलावाच कमी झाला परिणामी पिके वाळून गेली. पावसाचा तब्बल 21 दिवस खंड पडल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात 50 पेक्षा जास्त घट होणार असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसानीची 25 टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. विमा कंपन्यांबरोबर राज्य सरकारने चर्चा करून 628 कोटी रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतल्याने अग्रीम रक्कम देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 9 लाख 7 हजार 275 शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार आहे. जिल्ह्यात 74 मंडळातील 5 लाख 29 हजार 213 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र केवळ 43 टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील विविध पिकांची अवस्था दयनीय झाली. पाणी नसल्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे कृषी विभागाने यंदा खरीपाच्या उत्पादनात 50 टक्केपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्याची मागणी होत होती. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याचे मान्य केले. प्रशासनाला पावसाचा 21 दिवसांचा खंड असल्यास पंचनामे करून अग्रीम पीक विमा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने यंदा सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या योजनेत जिल्ह्यातील 11 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.अग्रीम देण्यासाठी कृषी, महसूल व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी 5 टक्के पंचनामे केले. त्यानुसार नुकसानाची माहिती संकलित करून क्षेत्र व शेतकरी निश्चित करण्यात आले आहे. मंडळनिहाय झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात 74 मंडळामधील 5 लाख 29 हजार 213 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यांना अग्रीम देण्यात येणार आहे. त्यानुसार 9 लाख 7 हजार 275 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मिळणार आहे.
जिल्ह्यातील अग्रीमसाठी पिकनिहाय क्षेत्र व शेतकरी संख्या पुढीलप्रमाणे आहे.
उडिद – जामखेड, कर्जत या दोन तालुक्यातील 11 मंडळातील 32 हजार 650.34 हेक्टर क्षेत्र असून 59 हजार 699 शेतकरी आहेत. मूग – जामखेड, पारनेर, संगमनेर, नगर, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या सात तालुक्यातील 44 मंडळमधील 56 हजार 773 शेतकरी पात्र ठरले असून त्यांचे 24 हजार 819.37 हेक्टर क्षेत्र आहे. भुईमुुग- पाथर्डी, पारनेर, नगर, संगमनेर, श्रीगोंदा, अकोले, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, शेवगाव या 12 तालुक्यातील 49 मंडळामध्ये 2 हजार 423.42 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्याचा फटका 6 हजार 445 शेतकऱ्यांना बसला आहे.
मका-संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या सात तालुक्यातील 7 मंडळांमधील 27 हजार 405.95 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून 54 हजार 290 शेतकऱ्यांना आता अग्रीम रक्कम मिळणार आहे. बाजरी- शेवगाव, पाथर्डी, पारनेर, नगर, संगमनेर, श्रीगोंदा, अकोले, नेवासा, राहुरी, कर्जत, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड या 14 तालुक्यातील 73 मंडळांमधील 57 हजार 429.78 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 1 लाख 15 हजार 758 शेतकरी या अग्रीम रक्कमेसाठी पात्र ठरणार आहेत.
कापूस- पाथर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, राहुरी, राहाता, शेवगाव, कोपरगाव, कर्जत, संगमनेर, जामखेड, नेवासा या 11 तालुक्यातील तब्बल 52 मंडळातील 1 लाख 587. 63 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 1 लाख 61 हजार 99 शेतकऱ्यांना अग्रीमसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. कांदा- पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, कोपरगाव, राहाता, नेवासा, श्रीरामपूर या 10 तालुक्यातील 52 मंडळातील 27 हजार 205.68 हेक्टर क्षेत्रातील 55 हजार 986 शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी अग्रीमची रक्कम मिळणार आहे.
तूर- पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, राहुरी, शेवगाव, कोपरगाव, कर्जत, नेवासा, नगर, श्रीरामपूर, राहाता, जामखेड या 12 तालुक्यातील 58 मंडळातील 55 हजार 943.70 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून 1 लाख 1 हजार 741 शेतकऱ्यांना आता नीक विम्याच्या अग्रीम रक्कमचा लाभ होणार आहे. सोयाबीन- अकोले, पारनेर, पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, नेवासा, नगर या 11 तालुक्यामधील 57 मंडळांना 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट झाली असून 1 लाख 88 हजार 860. 66 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यात 2 लाख 79 हजार 154 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात- अकोले तालुक्यातील 1 मंडळातील 1 हजार 971.61 हेक्टर क्षेत्र असून 2 हजार 611 शेतकरी आहेत.
पालकमंत्र्यांमुळे 9 लाख शेतकऱ्यांना लाभ
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळे आज जिल्ह्यातील तब्बल 9 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे. शासनाच्या 1 रूपया पीक विमा योजनेत नगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ द्यावा, यासाठी मंत्री विखे यांनी तालुकानिहाय दौरे व नियोजन केले. त्यामुळे तब्बल 11 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मंत्री विखे यांनी 1 रूपया पीक विमा योजनेत नगर जिल्ह्यात राज्यात आघाडी राहिला पाहिजे. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा नाही तर प्रयत्न केले. त्यात जिल्हा बॅंकेला पुढाकार द्यायला लावला. जिल्हा बॅंकेने देखील शेतकऱ्यांचा एक रुपया भरला. बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक रूपया विमा उतरविला. त्यामुळे आज जिल्ह्यात सर्वाधिक 9 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे यांच्या कामाचे जिल्ह्यात कौतूक होत आहे.
आ. गडाखांच्या मागणीमुळे तीन मंडळांना समावेश
नेवासे तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश नुकसानभरपाई न झाल्याने आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक होऊन या तीन मंडळांचा समावेश करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाने तातडीने त्याचा समावेश केला. त्यात कापूस- 2 मंडळ 8 हजार 560.69 हेक्टर क्षेत्र असून 11 हजार 857 शेतकरी आहेत. तूर- 3 मंडळातील 1 हजार 216.43 हेक्टर क्षेत्र असून 1 हजार 781 शेतकरी संख्या आहेत. भुईमुग- 4 मंडळातील 38.14 हेक्टर क्षेत्र असून 81 शेतकरी संख्या आहे.