मुंबई – जलेंगे हम तो जल जाएगा सारा गुलिस्तां माली, समझ मत सेहन-ए-गुलशन में मेरा ही आशियाना है! ओछी राजनीति के लिए नफ़रत का खेल बंद करो, देश में भाईचारे को बढ़ाओ। असे आवाहन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी केले आहे.
मीरा भाईंदर परिसरात झालेल्या दोन गटातील वादानंतर यांनी प्रकरणावरुन कळकळीची विनंती केली आहे. या संदर्भात बोलताना आझमी पुढे म्हणाले की, अशा प्रकरणामुळे समाजातील संस्कृतीला खीळ बसत आहे. मी कोणत्याही मंदराच्या विरोधात नाही मात्र, मुद्दाम मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जात, चिथावणी देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ वाढवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याच्या आधी देखील अबू आझमी यांनी असा प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली होती. तसेच सर्व मुस्लिम समाजाला शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले होते.
पुरावे नाही हे न्यायालयानेच सांगितले
अयोध्येतील वादाच्या जागेवर आधी मंदिर होते, याचे पुरावे मिळाले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले आहे. केवळ लोकभावनेच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही देखील लोकभावनेचा आदर करतोय. मात्र, काही लोक मुद्दाम मुस्लिमांच्या परिसरात, त्यांच्या धार्मिक स्थळासमोर जय श्री रामच्या घोषणा देत आहेत. या माध्यमातून मुस्लिम समाजाला चिथावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आमदार अबू आझमी यांनी केला आहे.