नाफेडने कांद्याचा वाढविला साठा
नवी दिल्ली – टंचाईच्या काळात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल ऍग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) कांदाच्या साठ्यात भरपूर वाढ केली आहे.
या वर्षात नाफेडने शेतकऱ्याकडून बाजारभावाप्रमाणे 95 हजार टन कांद्याची खरेदी केली.
गेल्या वर्षी 57 हजार टन कांद्याची खरेदी केली होती. टंचाईच्या काळात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी या वर्षी जास्त कांद्याची खरेदी करण्याचे ठरविले होते. ते उद्दिष्ट पूर्ण केले आहे असे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक एस के पुरी यांनी सांगितले.
भारतात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कांद्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर राजकीय असंतोष निर्माण होतो. यासाठी कांद्याची वर्षभर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमधून कांदा खरेदी केला.