पटना : देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच आता बिहारमधील भाजपच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यामधील बिसफी येथील भाजपा आमदार हरीभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांचा मतदानाचा हक्का काढून घेतला पाहिजे असे धक्कादायक वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे.
आमदार हरीभूषण ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण या नोटिसीतून मागवले आहे. बिहारमध्ये भाजपासोबत सत्तेत असणाऱ्या जनता दल युनायटेडने यावर तातडीने प्रतिक्रिया देत या वक्तव्याचा निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते निरज कुमार यांनी ठाकूर यांचे वक्तव्य हे ‘निंदनीय आणि दाहक’ असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही ठाकूर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
ठाकूर यांनी, “१९४७ च्या फाळणीमध्ये आपण मुस्लिमांना वेगळा देश दिला. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जायला पाहिजे, आणि जर त्यांना भारतात रहायचं असेल तर त्यांनी दुय्यम दर्जाचं नागरिक म्हणून राहिलं पाहिजे. आम्ही सरकारला विनंती करतोय की मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा,” असे म्हटले होते.
मुस्लीम एका अजेंड्यानुसार काम करतात असा आरोप ठाकूर यांनी केला आहे. या अजेंड्यानुसार भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा विचार असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे. यापूर्वीही ठाकूर यांनी अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहे. यापूर्वी त्यांनी बिहार विधानसभेच्या सभापतींनी वंदे मातरम न म्हणणाऱ्या मुस्लीम आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.