या पृथ्वीवर संगीत केव्हा जन्माला आलं, हे सांगता येणं अवघड आहे. पण कदाचित त्यावेळी लोकांना पानांची सळसळ आवडली असेल, लाटांची गाज मनाला सुखावून गेली असेल, कोकीळेचं कुजन कानात साठवून ठेवावसं वाटलं असेल. कारण ते खरंच मन आनंदी करणारं, चित्तवृत्ती फुलवणारं असतं. पिंपळाचं पान गुंडाळून त्यातून शिट्टीचा आवाज पहिल्यांदा आला तेव्हा, पोकळ बांबूतून बासरीचा आवाज आला तेव्हा, माणसाला काय वाटलं असेल याची कल्पना येऊ शकते.
सप्तसुरांचा शोध लागला तेव्हा तर माणसाला अत्यानंद झाला असेल. माणसाने या सप्तसुरात संगीत बसवलं आणि माणसाचं विश्वच बदललं. मग प्रत्येक प्रसंगाचं संगीत जन्माला आलं. सुख, दु:ख, प्रेम, वेदना सगळ्या भावनांच्या साथीला संगीत आलं. सणवार, आयुष्यातल्या सगळ्या अवस्था यावर गाणी लिहिली गेली.
दिवसाची सुरुवात-
घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकर वनमाळी उदयाचली मित्र आला
पासून रात्री झोपेपर्यंत-
नीज माझ्या नंदलाला रे, शांत हे
आभाळ सारे शांत तारे शांत वारे
या झऱ्याचा सुर आता मंद झाला
अशा सगळ्या वेळा गाण्याने सजू लागल्या.
प्रेमिकांनी प्रेम व्यक्त कसं करायचं हेसुद्धा गाण्याने ठरवलं
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणाऱ्या फुलातला
माणसाला आयुष्यात काही नकोसं झालं की
मनात येतं-
मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
ईश्वराकडे मागताना-
तुज मागतो मी आता मज द्यावे एकदंता
संगीताच्या सात सुरातून शास्त्रीय संगीत जन्माला आलं. रागमाला जन्माला आली. आजारी माणसाला गाण्याचे उपचार बरे करतात इतकी ताकद संगीतात आहे. संगीत माणसाचं दु:ख कुठल्या कुठे पळवून लावते.
मधुर सुरांची वाद्य जन्माला आली तो तर बहारदार दिवस. या वाद्यांमुळे एका जागेवर बसून पावसाचा, रेल्वेचा, लाटांच्या उधाणाचा आवाज ऐकायला मिळतो. संगीतात खरंच जादू आहे असं म्हणतात ते खोटं नाही. मग ते संगीत देशी असो की पाश्चात्य, शास्त्रीय असो की उपशास्त्रीय त्याने फरक पडत नाही.
देवादिकांच्या हातातली वाद्य माणसाने तयार केली. कारण कृष्णाच्या गाण्यांना बासरीच हवी आणि तांडव करायचे असेल तर मृदंगच हवा. काही प्रकारचे संगीत तर माणसाला बेभान होऊन नाचायला लावते. इतकी ताकद त्यात आहे. संगीताच्या साथीने कंटाळवाणा प्रवासही सहज होतो. माणसाचा एकटेपणा कुठच्या कुठे पळून जातो. माणसाचा उदासवाणा मूड संगीताने क्षणार्धात कसा बदलला हे त्याचं त्यालाही कळतं नाही. आपल्या भावनांना अनेक छटा पण संगीताने त्या नेमक्या पकडायचा प्रयत्न केला आणि त्याला ते जमलही. या संगीताचं अस्तित्व अनादि काळापासून आहे ते अनंत काळापर्यंत असणार आहे.
नीलम ताटके