बडोदा – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या मोसमातील सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत क गटातील आपल्या अखेरच्या सामन्यातही महाराष्ट्राचा पराभवच झाला व पाटी कोरी ठेवतच संघ राज्यात परतला. अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राला हिमाचल प्रदेशने 4 गडी राखून पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 20 षटकांत 9 बाद 117 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडचा (33) अपवाद वगळता महाराष्ट्राचा अन्य कोणीही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. हिमाचल प्रदेशाच्या रिषी धवनने 3 तर, पंकज जैस्वालने 2 गडी बाद केले. सुरुवात
आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचलदेशाची सुरुवातचिंताजनक होती. नवोदित तरणजितने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अभिमन्यू राणाला बाद केले. त्यानंतर चौथ्या षटकांत प्रदीप दाढेने लागोपाठच्या चेंडूवर रवी ठाकूर व एकांत सेन यांना बाद केले. पाचव्या षटकांत अझिम काझीने मणी शर्माचा अडसर दूर केला.
सत्यजित बच्छावच्या फिरकीने दिग्विजय रंगीला चकवले आणि हिमाचल प्रदेशाचा डाव 8.2 षटकांत 5 बाद 26 असा अडचणीत आला. त्या वेळी रिषी धवन आणि नितीन शर्मा एकत्र आले. पण, धावांची गती वाढवण्याच्या नादाक नितीन बाद झाला. हिमाचल प्रदेश 6 बाद 50 असा अडचणीत आला असताना रिषी धवन आणि आयुष जमवाल या जोडीने तुफानी फटकेबाजी करत महाराष्ट्राच्या हातून सामना काढून घेतला. या जोडीने 38 चेंडूंत 71 धावांची भागीदारी केली. रिषी धवन 48 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकारासह 61 धावा काढून नाबाद राहिला. आयुषने 14 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक – महाराष्ट्र 20 षटकांत 9 बाद 117 धावा. (ऋतुराज गायकवाड 33, अझिम काझी 17, स्वप्निल गुगळे 16, रिषी धवन 3-22, पंकज जस्वाल 2-18) पराभूत वि. हिमाचल प्रदेश 18.5 षटकांत 6 बाद 121 धावा. (रिषी धवन 61, आयुष जमवाल 27, प्रदीप दाढे 2-24, अझिम काझी 2-10)