मुंबई – वेगवान गोलंदाज प्रथमेश डाकेने केलेल्या प्रभावी गोलंदाजीबरोबरच सर्फराज खान व शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने अखेरच्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशचा 5 गडी व 7 चेंडू राखून पराभूत केले.
सुरुवातीचे सलग चार सामने गमावल्यामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करताना आंध्र प्रदेशला 20 षटकांत 8 बाद 154 धावांवर रोखले. रिकी भुईने आंध्र प्रदेशसाठी 78 धावांची खेळी साकारली.
प्रत्युत्तरात कर्णधार सूर्यकुमार यादव (22) आणि यशस्वी जयस्वाल (13) लवकर बाद झाले. परंतु 4 बाद 64 धावांवरून सर्फराज आणि दुबे यांनी पाचव्या गडयासाठी 87 धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय साकार केला.