मोशी -पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कचरा मोशी येथील कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे मोशीतील माळरानावर डोंगरासारखे कचऱ्याचे ढीग लागले आहेत. परंतु या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने येथील कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
श्वसनाचे आजार वाढले
कचरा डेपोतून निघणारा धूर, विषारी वायू, धूलिकण यामुळे या भागात नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले यांना श्वसनाचे विकार वाढू लागले आहेत. त्यामुळे कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काय करावे आणि काही नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दम्याचा आजार असणाऱ्या वयोवृद्धांना श्वास घेताना त्रास होत आहे. तर लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेने यावर ताबडतोब कायम स्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
मोशीतील कचरा डेपोमुळे परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक रहिवाशांना घरात राहणे मुश्कील झाले आहे.संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलित करून मोशीच्या कचरा डेपोत आणला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करताना त्याची दुर्गंधी डेपोलगतच्या तापकीरनगर, खानदेशनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी, वाघजाई पार्क, बोराटे वस्ती, मोशी प्राधिकरण या परिसरात पसरली आहे. त्यामुळेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सध्या वाऱ्याची दिशा बदलल्याने जास्तच दुर्गंधी येत आहे. ऑक्टोबरनंतर वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागले की, या भागातील नागरिक पुढील काही महिनेतरी दुर्गंधीतून वाचण्यासाठी घराचे दारे, खिडक्या बंद घेतात. मोशीतील शेतकरी, नागरिक नव्यानेच उभारलेल्या सोसायटीतील रहिवासी कचरा डेपोच्या या दुर्गंधीतून आपली कधी सुटका होईल असा प्रश्न एकमेकांना विचारतात.
कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबद्दल येथील स्थानिकांकडून अनेकदा आंदोलन करण्यात आले. परंतु राजकीय आणि प्रशासन यांच्या अनास्थेमुळे येथील विकासावर देखील परिणाम होत आहे. बांधकाम व्यावसायिक या भागात नवीन प्रकल्प उभारण्यास नकार देत आहेत. ज्या त्या प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट त्याच प्रभागात लावण्याच्या प्रशासनाच्या संकल्पनेला हरताळ फासण्यात आला आहे. आमच्या कुटुंबीयांना मोकळा श्वास या जन्मात घेता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– संतोष बोराटे, रहिवासी.
वारंवार लागतेय आग
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु ठेकेदार, राजकीय नेते आणि महापालिका प्रशासन यांच्यात मीलिभगत असल्याने कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी रातोरात आग लावून कचरा जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तर होतेच परंतु स्थानिक नागरिकांचे जगणे मुश्कील होत आहे. परंतु महापालिकेचा नाकर्तेपणा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे.