पिंपरी, दि. २४ – जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी सातच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये घडली.सूरज उर्फ सोन्या संदीप शिंदे (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किशोर दत्तात्रय सोनवणे (वय १८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, (सर्व रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे हा शुक्रवारी सायंकाळी जाधववाडी येथील बैलगाडा घाटामध्ये मित्रांशी गप्पा मारत होता. दरम्यान, तेथे आलेल्या आरोपी आदित्य पाटोळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. आरोपींनी आपसात संगनमत करून सुरज याच्यावर तलवार, पालघन यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने सुरज याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी हे सुरज शिंदे यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी किशोर यांना काही पैसे देऊन खायला चकणा आणण्यास सांगितले. किशोर चकणा घेऊन येत असताना त्यांचा मित्र सुरज याचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तोपर्यंत सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरज याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सुरज याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.