पंढरपूर – वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. या कॉरिडॉरचा आराखडा देखील जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. मात्र, या कॉरिडॉरला पंढरपूरातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुंबईत येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर स्वामी यांनी आज पंढरपूर येथे भेट देऊन नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, प्रकल्पाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावा. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबाबत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आलेले आहे. हे अनैतिक सरकार आहे.
यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, मंदिरे सरकारमुक्त करण्याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार का? त्यावर उत्तर देताना स्वामी म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नाहीत, त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत, ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचे चमचे आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सरकारने मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. मग सरकार चर्च आणि मशीदी आपल्या ताब्यात का घेत नाहीत? वक्फबोर्डात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, ते सरकार ताब्यात का घेत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला. तसेच पंढरपूरातील पायाभूत सुविधांकडे सरकारने लक्ष द्यावे, चंद्रभागा नदी प्रदुषण मुक्त करावी, रस्ते सुसज्ज करावेत, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.