इस्लामपूर – एकाच गर्लफ्रेंडवर हक्क कोणी गाजवयाचे तू की मी याच्या वर्चस्ववादातून पेठ (ता. वाळवा) येथे अभिजित हरी शेलार (वय २२) याचा बुधवारी भर दुपारी पाठलाग करत सिने स्टाइलने खून केला.
मृत अभिजित याचाच जिवलग मित्र राजेंद्र मारुती बांदल (वय २५ रा.जांभूळवाडी ता.वाळवा ) याने चाकूने सपासप १२ वार करून खून केला. पेठ गावच्या हद्दीत बॉम्बे रेयॉन कंपनीच्या पिछाडीला दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान खुनाचा प्रकार घडला.खून करून संशयित पोलीस ठाण्यात हजर झाला.
या प्रकरणी मृत अभिजीत याची आई सुवर्णा हरी शेलार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, जांभूळवाडी येथील अभिजित हरीश शेलार व राजेंद्र मारुती बांदल हे दोघे मित्र होते. शिक्षण घेत दोघे सेंट्रींग काम करत होते. मृत अभिजित याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. या दोघांचे भेटणे चालू असायचे. दरम्यान मित्र असणाऱ्या राजेंद्र याची ओळख मुलीबरोबर वाढत गेली. दोघे मित्र एकाच मुलीवर प्रेम करत वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होते. यातून राजेंद्र याने आपला मित्र अभिजित याचा काटा काढायचा असा निश्चय केला.
आज बुधवारी अभिजितला संपवायचे या इराद्याने धारधार चाकू घेवून वावरत होता. दुपारची वेळ साधत राजेंद्र याने अभिजितचा पाठलाग केला. आपले काही तरी बरे वाईट होणार या भीतीने जांभूळवाडी गावातून पेठ गावच्या हद्दीत बॉम्बे रेयॉन कंपनीच्या पिछाडीला धावत सुटला.रिकाम्या माळरानावर कोणी नसल्याने अभिजीत शेलार हा राजेंद्र याच्या तावडीत सापडला.
त्याने अभिजित याच्या पोटात सपासप वार केले आहेत. हे वार वर्मी लागल्याने तो जागीच मृत झाला. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या अभिजितचा गळयावर वार करून त्याचा कंठ तोडला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यावर राजेंद्र बांदल स्वतःहून इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भेट दिली.
एकाच गर्लफ्रेंडवर प्रेम.. अन् प्रेमाचा त्रिकोण..
जांभूळवाडी येथील मृत अभिजित शेलार व राजेंद्र बांदल हे दोघे जिवलग मित्र होते. दोघेही शिक्षण घेत सेन्ट्रीग कामावर जात होते. गावातील एकाच मुलीवर दोघेही प्रेम करीत होते. याच प्रेमाच्या त्रिकोणातून जिवलग मैत्रीचा दुर्दैवी अंत झाला. अतिशय क्रूरतेने मित्रावर चाकूने सपासप वार केले. गळयावर वार करून कंठ तोडला.