पिंपरी – कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली आहे. करोनात दोन्ही पालक गमावलेल्याने अनाथ झालेल्या बालकांची या कृती दलाला माहिती देण्याकरीता महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज (दि.18) आदेश निर्गमित केले आहेत.
प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे या समितीचे प्रमुख असतील तर नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव, बाधित व्यक्ती आणि मृत्युंचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. करोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या राज्यात निर्माण झाली आहे. ही बालके शोषणास तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांचा बळी ठरण्याची ठरण्याची शक्यता जास्त आहे. अशा बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी, तसेच कोविड-19च्या परिस्थितीमध्ये बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्यास अशी बालके सुरक्षित निवारा, योग्य पोषणापासून वंचित राहण्याची व त्यांच्या शोषणाची जोखीम वाढते. त्यामुळे या परिस्थितीत अशा बालकांसाठी प्रयत्न आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा तातडीने शोध घेऊन अचूक माहिती कृती दलाला उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकास्तरावर अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. शहराच्या हद्दीत अशी बालके आढळल्यास जवळच्या महापालिका कार्यालयात याची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.