पुणे – गणेशोत्सव दोनच दिवसांवर येऊन ठेपला असून, घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (31 ऑगस्ट) ब्राह्ममुहूर्त पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करावी.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.
विसर्जन करा दिवसभरात
यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी (9 सप्टेंबर) आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे, असे दाते यांनी सांगितले.
दिवसभरात केव्हाही करा गौरी आवाहन
शनिवारी (3 सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने रोजी रविवारी (4 सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी (5 सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री 8 वाजून 6 मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.
==================