सातारा -महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून कारभारात सुधारणा करा, अशा शब्दात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, समितीचे सदस्य राजेंद्र लावंघरे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे नादुरुस्त झालेले डीपी लवकरात लवकर दुरुस्त करा.
आमदारांनी सुचविलेली कामे पूर्ण झाल्यानंतर ते त्यांना कळवा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या. शंभूराव देसाई म्हणाले, “विभागून काम करावे म्हणजे डी. पी. दुरुस्तीला वेळ लागणार नाही व शेतकऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील.’ खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, “विद्युत वितरण कंपनीकडे दूरध्वनी क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींचे लवकरात लवकर निरसन करावे. ज्या तक्रारी जिल्हापातळीवर सोडविण्यासारख्या आहेत.
त्या लवकरात लवकर सोडवा.’आ. महेश शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विद्युत ट्रान्सफार्मरसाठी शेतकऱ्यांची लूट होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर काही महिन्यातच खराब होत असून त्यास काही गॅरंटी, वॉरंटी नाही का? शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम होत असून ही बाब गंभीर आहे.
अधिकारी टोलवाटोलवी करत असून याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. मीटर रिंडींगबाबत अनेक तक्रारी असून माझ्या घरचे पाच वर्षे रिडींगच झाले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. आ. दीपक चव्हाण यांनी महावितरणच्या कामाचा जोरदार भांडाफोड केली. अधिकारी माहिती एक देतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन मिळत नाहीत, विद्युत ट्रान्सफार्मर बसवण्याबाबत दिरंगाई होत आहे. शेतकऱ्यांना वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची वेळ आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत प्रदीप विधाते यांनीही नाराजी व्यक्त केली. महावितरण सध्या अडचणीत आले असून वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. राजेंद्र लावंघरे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. महावितरणच्या गौतम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.